विराट कोहलीचा पराक्रम, धोनी-गांगुलीला टाकले मागे
दक्षिण आफ्रिकेचा सहा गड्यांनी पराभव करत भारतीय संघानं विश्वचषकाची सुरूवात दणक्यात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा ५० वा विजय ठरला आहे. एकदिवसीय सामन्यात ५० विजय मिळवणारा विराट कोहली चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारतीय संघाला सर्वाधिक वेगवान ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीनं एम. एस. धोनी आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज माजी कर्णधारांना मागे टाकले आहे. ५० विजयासाठी धोनी ११०, मोहम्मद अजहरुद्दीन ९० आणि सौरव गांगुलीला ७६ सामने वाट पहावी लागली होती. विराट कोहलीनं ६९ व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी सामन्यात संघाला ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. विंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस यांचा विक्रम कोहलीनं मोडला. व्हिव्हियन रिचर्डस यांनी ७० सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले होते. विंडीजचे क्लाइव लॉयड आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग सर्वाधिक विजय मिळवण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ६३ सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे हॅन्सी क्रोनिए आहेत.
दरम्यान, रोहित शर्माची आक्रमक शतकी खेळी आणि गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे.