breaking-newsमुंबई
वाढत्या ताकदीमुळेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या विरोधात सूडाने कारवाई
- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपवर आरोप
मुंबई : राज्यात सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच सत्ताधारी भाजपचे नेते हबकले असावेत. त्यातूनच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सहकारी बँकेशी काहीही संबंध नसताना अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला. प्रफुल्ल पटेल, अजित पवार आदी नेत्यांच्या मागे चौकशींचा ससेमीरा मागे लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारची कामगिरी निराशाजनक झाली. सामान्य जनतेपुढे दाखविण्यासाठी काहीच नसल्याने अनुच्छेद ३७० सारखे भावनिक मुद्दे मांडले जात आहेत. वास्तविक बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकरी आदी गंभीर प्रश्न असताना भाजपचे नेते या मुद्दय़ांवर सोयीस्कर मूग गिळून गप्प आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळेच रोजगार बुडत आहे.