महापालिका बीआरटीत सव्वाशे कोटीचा गोलमाल ?; अधिका-यांची ईडीकडून चाैकशी करा, शिवसेनेची मागणी
पिंपरी (पुणे) – शहरातील वाहतूक सुरळीत व जलद मार्गाने व्हावी, याकरिता महापालिकेच्या बीआरटी विभागाने बीआरटीएस प्रकल्प राबविला. परंतू, मागील दहा वर्षांत अधिका-यांनी करदात्यांचा कोट्यावधी रुपयांचा अपव्यय करुनही अद्याप बीआरटी मार्ग सुरु केले नाहीत. त्या बीआरटीएस प्रकल्पाच्या एकूण खर्चात तब्बल 115 कोटी रुपयाचा गोलमाल झाला असून त्या अनावश्यक रक्कमेची वसूली संबंधित अधिकारी व पदाधिका-याकडून करावी, तसेच त्यांची ईडीमार्फत चाैकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, शहराध्यक्ष योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. अॅड, भोसले म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी अहमदाबादच्या धर्तीवर बीआरटीएस प्रकल्प राबविला. बीआरटी विभागाने आैंध-रावेत, नाशिक फाटा ते वाकड हे दोनच मार्गच रडखडत सुरु आहेत. उर्वरीत काळेवाडी – आळंदी, निगडी – दापोडी, देहू – आळंदी, बोपखेल – आळंदी, भक्ती शक्ती – किवळे या मार्गावर बॅरीगेटस् बांधले आहेत. त्या जागेचा वापर बेकायदेशीर पार्किंगसाठी होत आहे.
बीआरटीच्या मार्गावर एकूण 84 बस स्टाॅप बांधण्यासाठी 41.02 कोटीचा खर्च करण्यात आला. त्यातील एका बस स्टाॅपसाठी सुमारे 45 ते 50 लाख रुपये खर्च करुन फक्त लोखंडी सांगाडे उभारले आहेत. या प्रकल्पावरील देखभालीसाठी सुरक्षा यंत्रणा, उद्यान विभाग, विद्युत व स्थापत्य विभागाच स्वतंत्र खर्च झालेला आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग सुरु नसतानाही ठेकेदार, अधिकारी व पदाधिका-याचे खिसे भरण्याचा काम सुरु आहे. तसेच बीआरटीच्या अनेक साहित्याची चोरी होवूनही एकही तक्रार पोलिसाकडे केलेली नाही.
निगडी – दापोडी प्रकल्पाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतानाही त्यावर महापालिकेने 2017-18 मधील अर्थसंकल्पातून 4.98 कोटी खर्च केले. शहरात बीआरटीचे एकूण 7 मार्ग हे (75.1 किमी) नियोजन आहे. दहा वर्षात त्यापैकी 22.5 किमी मार्गावर तब्बल 890.47 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यामुळे बीआरटी प्रकल्पावर एकूण झालेल्या खर्चाची माहिती देताना माहिती व तंत्रज्ञान विभाग व लेखा विभागाने दिली. त्यात तब्बल 114.39 कोटी रुपयाची तफावत आढळून आली आहे. याबाबत बीआरटीचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांची सक्त वसूली संचालनायलाकडून चाैकशी करावी, याकरिता त्यांची तक्रार करणार असल्याचेही अॅड भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, बीआरटी प्रकल्पावरील शेकडो कोटी खर्च करुनही बीआरटीचे मार्ग रखडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी चाेर तर भाजप दरोडेखोर असल्याची टीका शिवसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी केली. तसेच शहरातील बीआरटी मार्गावरील बस स्टाॅप जुगाराचे अड्डे आणी मार्ग पार्किंगाचा वापर केला जात असल्याचा आरोपही राहूल कलाटे यांनी केला.