#CoronaVirus | वरळी कोळीवाडा कंटेनमेंट झोनमुक्त होणार
मुंबई | मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोळीवाडा २९ मार्चपासून सील करून कंटेनमेंट करण्यात आला होता. यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे आता वरळी कोळीवाडा आज (७ मे) मुंबईतील पहिले कंटेनमेंट झोनमुक्त होणार असल्याची आनंदायी बातमी आहे. गेल्या ३७ दिवसांपासून कोळीवाडा कंटेनमेंट झोन होता. वरळी कोळीवाड्यात २९ मार्चला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. यानंतर मुंबईतील पहिले कंटेनमेंट झोन म्हणून घोषणत केले होते. यानंतर जनता कॉलनीतही करोनाचा रुग्ण आढळून आल्याने कोळीवाडा व जनता कॉलनीमधील सुमारे दोनशेहून अधिक लोकांना पोद्दार रुग्णालयात अलगीकरण कक्षात अर्थात क्वारंटाईन करण्यात आले होते.
यानंतर वरळी कोळीवाडा आणि जनता कॉलनी पूर्णपणे सील आणि कंटेनमेंट करण्यात आला होता. यावेळी स्थानिक रहिवाशांना घरपोच सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. यानंतर गेल्या ठेवण्यात आलेले पॉझिटिव्ह असलेले रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आता घरी परतू लागले आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा आता १० हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत काल (६ मे) ७६९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत १० हजार ७१४ कोरोना रुग्ण आहेत. तर ३७४ जण ठणठणीत बरे झाले आहेत.राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. काल (६ मे) १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.