वरळीमध्ये ‘कोस्टल रोड’च्या खड्डय़ात पडून मुलाचा मृत्यू
महापालिकेच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गासाठी खणलेल्या खड्डय़ात पडून शुक्रवारी एका १२ वर्षांच्या मुलाला प्राण गमवावे लागले. वरळी येथे ही दुर्घटना घडली. बबलुकुमार रामपुनील पासवान असे या मुलाचे नाव आहे. मालाड येथे गटारात पडून दीड वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची दुर्घटना ताजी असतानाच पालिकेचा निष्काळजीपणा दाखवणारी आणखी एक दुर्घटना घडली आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सीलिंकपर्यंतच्या सागरी मार्गाचे काम सध्या तीन टप्प्यांत सुरू आहे. वरळी येथील अमरसन्स ते वांद्रे दरम्यान सागरी किनारा मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी हा खड्डा खणला आहे. वरळी येथे मद्रासवाडी येथील झोपडपट्टीत शौचालय नसल्याने काही मुले समुद्र किनाऱ्यावर शौचास (पान १०वर) (पान १वरून) जात होती. बबलु शुक्रवारी संध्याकाळी आपल्या काही मित्रांसोबत तिथे गेला होता. त्या वेळी वरळी सीलिंकजवळ सागरी किनारा मार्गासाठी खणलेल्या खड्डय़ात पडला. बबलू बुडत असल्याचे पाहताच नागरिकांनी त्याला बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागरी किनारा मार्गामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार असल्यामुळे त्याला मच्छीमारांचा विरोध आहे. मात्र या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल आणि मासेमारीवर काही परिणाम होणार नाही, असा दावा महापालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने केला होता.
नागरिकांमध्ये संताप
या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र खड्डा खणलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची दक्षता घेण्यात आली होती, असा दावा संबंधित अधिकारी करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी डॉ. दीपक अमरापूरकर हे भुयारी गटारद्वारामध्ये (मॅनहोल) पडून वाहून गेल्यानंतर पालिकेच्या बेजबाबदारपणावर प्रचंड टीका झाली. याच आठवडय़ात मालाड येथील आंबेडकर चौक परिसरातील गटारात दीड वर्षांच्या मुलगा वाहून गेला. आणखी किती बळी जाण्याची वाट पालिका पाहत आहे, असा सवाल नागरिक करीत आहेत.