वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार-मुख्यमंत्री
वडार समाजाने विश्वकर्म्याचं काम अवघ्या देशात केलं आहे. ज्यांच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली त्यांच्यातला बहुतांश समाज हलाखीत जगतो आहे हे दुर्दैव आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय विठ्ठलाचा रथ पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वडार समाजाशिवाय महाराष्ट्र पुढे कसा जाईल? असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सोलापुरात झालेल्या वडार समाजाच्या मेळाव्यात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इंग्रजांनीही वडार समाजावर बंधने टाकली, मात्र वडार समाज आक्रमक राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून हा समाज समस्यांशी झुंजतो आहे. त्याच्या वेदना त्याची दुःखं दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे. इदाते समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झाले तर वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल तुम्ही यासाठी प्रय़त्न करा अशी विनंती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी केली. रामदास आठवले आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर होते. त्याचवेळी आपण सगळ्यांनी वडार समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बेघरांना घर देणार, वस्त्यांची जागा वडार समाजाच्या मालकीची होईल अशी व्यवस्था करू असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
वडार समाजाच्या पाठिशी हे सरकार कायम उभं आहे. वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली आहे. होतकरू तरूणांसाठी, समाज भूषणांसाठी ज्या ज्या आवश्यकता असतील त्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार आणि समाज यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे, जी व्यवस्था सरकारचे निर्णय समाजापर्यंत पोहचली पाहिजे. याचसाठी मी महाराष्ट्र समन्वय समितीची मी घोषणा करतो आणि विजय चौगुलेंना त्याचे अध्यक्ष करतो अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच विजय चौगुलेंना राज्यमंत्री करतो असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.