‘लोक सोनिया गांधींना भेटतात, आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ’
लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर बिघडलं कुठे? अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी सोनिया गांधींची जी भेट घेतली त्यावर टोला लगावला आहे. सोमवारी दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीबाबत जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आले तेव्हा हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणार आहेत असं समजतंय असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा काही लोक सोनिया गांधींना भेटतात, आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर काय बिघडलं? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी जागवल्या. इंदिरा गांधी या आक्रमक होत्या, त्यांनी देश घडवला. शिवसेना बंद करण्याचा घाट काहीजणांनी घातला होता तो त्यांनी हाणून पाडला. या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार आम्ही आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यामध्ये बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांना आषाढीच्या विठ्ठल पूजेबाबत जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ते म्हटले काही लोक सोनिया गांधींची भेट घेतात मग शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर बिघडलं कुठे? असा प्रश्न विचारत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली तेव्हा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातं आहे. महाराष्ट्रात येत्या एक दोन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत मनसे जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अशात सोमवारी राज ठाकरेंनी सोनिया गांधीची भेट घेतल्याने ही नव्या समीकरणाची नांदी आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तर संजय राऊत यांनी टोमणा मारून राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.