लोकलच्या वाढीव फेऱ्यांबाबत पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय; सोमवारपासून 350 ऐवजी आता लोकलच्या 500 फेऱ्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी मुंबईला बसला. मुंबई थांबली तशी मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल थांबली आणि अनेकांच्या रोजगारालाही ब्रेक लागला. मात्र नंतर अनलॉकच्या टप्प्यानंतर लाखो कामगार पुन्हा कामावर परतू लागले मात्र सर्वांचीच लोकलअभावी कोंडी होत होती..
राज्य सरकारच्या विनंतीवरून केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकल चालवल्या जात असल्या तरी बाकी नोकरदारांना लोकलचे दरवाजे बंद असल्याने त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. मात्र ज्याकर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती त्यांना मात्र उद्यापासून खूप मोठा दिलासा मिळणार आहे.वाढीव फेऱ्यांबाबत मध्य रेल्वेने कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी पश्चिम रेल्वेने मात्र प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दी टाळण्यासाठी उद्या सोमवारपासून दररोज ३५० ऐवजी लोकलच्या ५०० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच सध्या लोकल चालवण्यात येत असल्या तरी या कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे लोकलमध्ये सकाळी व संध्याकाळच्या वेळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळली जावी, या उद्देशानेच लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क वापरावे, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर धावणाऱ्या विशेष लोकलवर उद्यापासून आणखी ताण वाढणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने सहकारी आणि खासगी बँकांमधील १० टक्के कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. उद्या सोमवारपासून हे कर्मचारी लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत.