लिखाणातून प्रेक्षकांना रंगभूमीकडे वळवा
- ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे नवोदित लेखकांना आवाहन
डोंबिवली : पूर्वीच्या सर्वच दिग्गज लेखकांनी खूप वाचन करून त्यांच्या नाटकांचे लिखाण केले. त्या लिखाणाला कलाकारही तितक्याच तोडीचे मिळाले म्हणून अशा नाटकांचे शेकडो प्रयोग झाले. नवलेखकांनीही भरपूर वाचन करून संहितालेखन केले पाहिजे. अलीकडे एक धागा पकडून नवोदित लेखक नाटक लिहितात, पण त्या लिखाणात प्रेक्षकांना रंगभूमीकडे वळविण्याची ताकद असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी केले. डोंबिवली येथे झालेल्या ‘चतुरंग’च्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे प्रयोग आजही तेवढय़ाच गर्दीने पार पडतात. या नाटकाच्या लिखाण, संहितालेखनाची ही ताकद आहे. बळकट संहिता ही नाटकाची खरी ताकद आहे. त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे या वेळी सुहास जोशी यांनी सांगितले. डॉ. श्रीराम लागूंबरोबर ‘नटसम्राट’ नाटकाचे ७० प्रयोग केले. या अभिनयातून खूप काही शिकायला मिळाले. या नाटकाचे माधव वाटवे यांनी उत्तम दिग्दर्शन केले. नाटकात हाताळलेला प्रश्न, भाषा, पात्र योजना या गोष्टी सततच्या प्रयोगातून कलाकाराला खूप काही शिकवून जातात. प्रतिभा ही जन्मजात मिळत नाही, ती अभ्यासातून मिळते, असेदेखील जोशी यांनी सांगितले. राष्ट्रीय नाटक अकादमीत असतानाच रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीतून रंगमंचावर उभे राहण्याचे धाडस मिळाले. नाटक अकादमीतून बाहेर पडल्यावर आपण सिनेमात काम करू असे कधी मनात नव्हते. मात्र, उपजत कलागुण, अभिनयामुळे सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. नाटकाचा अभिनय करताना समोर कोण बसलंय, प्रेक्षक काय दर्जाचा हे न पाहता आपण तालीम कसून केली आहे एवढे भान ठेवून भूमिका पार पाडली तरी आपल्या भूमिकेतील कस प्रेक्षकांना दाखवून देता येतो, असे जोशी यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले.