लाडशाखीय वाणी समाजामुळेच खासदार झालो – डॉ. सुभाष भामरे
पैसा आणि जाती, पातीचा निवडणूकीमध्ये उपयोग होत नाही – डॉ. गिरीष महाजन
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माझ्या मतदार संघात लाडशाखीय वाणी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. समाजाचे माझ्यावर प्रेम असल्यामुळेच या मतदारांची 95 टक्के मते मिळवून मी प्रथम खासदार झालो आणि केंद्रातील महत्त्वाचे संरक्षण राज्यमंत्रीपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी निवड केली, वाणी समाजामुळे मला ही देशसेवेची संधी मिळाली, हे ऋण मी विसरणार नाही अशी भावना, या महाअधिवेशनात आल्यानंतर खान्देशात असल्याचा भास होत आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने पुणे (मारुंजी) येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. 25 नोव्हेंबर) केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर.एन.वाणी तसेच अनिल चितोडकर, निलेश पुरकर, राजेश कोठवडे, श्यामकांत शेंडे, राजेंद्र मालपुरे, शरद वाणी, विलास शिरोडे, कल्पेश भुसे, राजेंद्र पाचपुते आदींसह राज्यभरातून आलेले 40 हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे, व्हा. ॲडमिरल सुनिल भोकरे, जयंत वाणी (ओएसडी, मंत्रालय), सुनील भामरे यांचा विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
वाणी समाजात व्यवहार, कौशल्य आहे. हा समाज उद्योग, व्यवसायातून नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देत आला असून देश उभारणीत मोलाचा वाटा आहे. ‘व्हीजन’ असेल तर समाज पुढे जातो. पंचसुत्रीनुसार काम केल्यास लाडशाखीय वाणी समाजाचा जगभर झेंडा फडकेल असे डॉ. भामरे म्हणाले.
डॉ. गिरीष महाजन म्हणाले की, भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर अर्थ, उद्योग, व्यापार, शिक्षण, वैदयकीय, पर्यटन, उत्पादन, निर्यात, दळणवळण, तंत्रज्ञान या क्षेत्रात आदराने घेतले जावे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीने अपार कष्ट, मेहनत घेण्याची गरज आहे. वाणी समाज देखील मोठ्या कष्टाने उभा राहिला आहे. ही घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. शासनाने उद्योग, व्यवसायांच्या उभारणीसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या संधीचा नव उद्योजकांनी फायदा घेतला पाहिजे. कुठलीही अपेक्षा न बाळगता कार्य करीत राहिले तर यश नक्कीच मिळते. मी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे. पंधरा वर्ष अजित पवार हे या खात्याचे मंत्री होते. हे खाते सांभाळत असताना एक ही शिंतोडा उडू देणार नाही, अशी खात्री डॉ. महाजन यांनी दिली.
सुत्रसंचालन राहुल सोलापूरकर, समिरा गुजर यांनी केले. आभार शामकांत वाणी यांनी मानले.