राहुल गांधींनी राजीनामा मागे न घेतल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे अशी जवळपास सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे दिसते. कारण, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता बिहारमधील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी राजीनामा मागे न घेतल्यास सामुहिकरित्या आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, बिहारची राजधानी पाटण्यात ते सध्या असून येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरामध्ये काही ठिकाणी राहुल गांधींच्या स्वागताचे प्लेक्स लावले आहेत. तसेच त्यावर राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा आणि काँग्रेस अध्यक्षपदावर कायम रहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधींनी राजीनामा मागे न घेतल्यास आम्ही १२ जण ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता आत्मदहन करु, अशा शब्दांत त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी देखील राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राजस्थानातील एका काँग्रेस कार्यकर्त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा स्टंट केला होता. मात्र, घटनास्थळी असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी त्याला असे करण्यापासून रोखले होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्विकारत राहुल गांधी यांनी निकालानंतर काही दिवसांतच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा पक्षाने अद्याप स्विकारलेला नाही. मात्र, राहुल गांधींचीच या पदावर राहण्याची इच्छा नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवरुन काँग्रेसचे अध्यक्ष ही ओळख हटवत केवळ खासदार म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे.