राष्ट्रीय महामार्गावरील टोल बंद होणार नाही – गडकरी
मुंबई – राष्ट्रीय महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या टोलमधून कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे केंद्रीय रस्ते परिवहन आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. चांगल्या सेवांसाठी नागरिकांनी पैसे मोजायला हवेत, असे गडकरी म्हणाले. रस्ते बांधण्यासाठी “बीओटी’ अर्थात बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा हे तत्वानेच निधी उभारला जात असल्याने टोल आकारणी कधीही रद्द होणार नाही, असे गडकरी म्हणाले. काल रात्री पीटीआय कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत गडकरी यांची चिंता व्यक्त केली आणि महामार्गांवरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी परिवहन मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षभरात देशभरात 4.60 लाख रस्ते अपघात झाले आणि 1.46 लाख मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
महामार्गांवरील टोल बंद करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था आणि मनसेसारख्या विरोधीपक्षांच्यावतीने सातत्याने केली जात आहे. त्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी टोलबाबत स्पष्टिकरण दिले.