‘राम मंदिराबाबत धमक्या देणाऱ्या मसूद अजहरचा सर्जिकल स्ट्राईकमध्ये खात्मा करू’
राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या देशात वातावरण ढवळून निघालं आहे. अयोध्येत रामाचं मंदिर झालंच पाहिजे अशी भूमिका साधू संत, विहिंप आणि निर्मोही आखाड्याने घेतली आहे. तसेच राम मंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश काढावा अशीही मागणी करण्यात येते आहे. याबाबत दहशतवादी मसूद अजहरने एक धमकी दिली होती. राम मंदिराची निर्मिती झाली तर दिल्ली ते काबूलपर्यंत दंगली उसळतील असा इशाराच मसूदने दिला. मात्र त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे. मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांनी जर आम्हाला राम मंदिराबाबत धमकी दिली तर पुढच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये त्याचा आणि त्याच्यासारख्या अनेकांचा खात्मा करू. त्याला पोसणारे त्याचे पोशिंदे आमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
राजस्थान येथील विजयनगर या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांनी मसूद अजहरच्या धमकीला प्रत्युत्तर दिले आहे. मसूदसारखे लोक राम मंदिराबाबत गरळ ओकणार असतील तर आम्हाला दुसरा सर्जिकल स्ट्राईक घडवावा लागेल आणि त्याचा आणि त्याच्यासारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू. मसूदचे पोशिंदेही त्याला वाचवू शकणार नाहीत असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मसूद अजहर नेमकं काय म्हटला होता?
बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावण्यात आली. त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे मंदिर बांधण्यात आले. आता त्याच जागेवर रामाचे भव्य मंदिर बांधण्याची मागणी होते आहे. जे मागणी करत आहेत त्यांच्या हाती तलवार आणि त्रिशूळ आहे. तर मुस्लिम बांधव घाबरलेले आहेत. बाबरी मशीद आम्हाला बोलावते आहे. आमच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे. आम्ही मुस्लिम बांधवांसाठी मशीद पुन्हा उभारू. अल्लासाठी आमचे प्राणही हजर आहेत. राम मंदिराची निर्मिती त्या जागेवर व्हायला नको, ती जागा मशिदीची आहे. आता राम मंदिर जर त्या जागी बांधले गेले तर दिल्ली ते काबूलपर्यंत हिंसाचार माजवू, दंगली घडवू हे याद राखा.