राज्यातील धरणे, पूल, बोगद्यांचे पावसाळ्यापूर्वीच ऑडिट करा : माजी खासदार गजानन बाबर
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
आगामी पावसाळ्यात धरणे, पूल, बोगदे, रस्त्याकडेच्या डोंगरकडा यांचे योग्य परीक्षण व आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे आपत्ती परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यामुळे या सर्व बाबींचे पावसाळ्यापूर्वी ऑडिट करून योग्य उपाययोजना करण्याची विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या विनंती पत्रात बाबर म्हणाले की, पावसाळ्यामध्ये पूल कोसळणे, दरड कोसळणे, स्टॅबिलिटी नसणाऱ्या इमारती कोसळणे, धरण भिंतीला तडा जाणे, महामार्ग रस्त्याची दुरवस्था होणे असे विविध प्रकार घडत असतात. या प्रकरणी दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात जीवितहानी तसेच वित्तीयहानीचा सामना करावा लागतो.
महापालिका प्रशासनाने वेळीच या प्रकरणी लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी राज्यातील पूल, बोगदे, रस्त्याच्या बाजूकडील डोंगरकडा, जुन्या इमारती, धरणे यांचे सक्षम अधिकाऱ्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं आवश्यक असल्याचे बाबर म्हणाले.
तसेच, पावसाळ्यापूर्वी राज्यातील ठिकाणी ऑडिट करून संबंधित अहवाल हा प्रदर्शित करून योग्य उपाययोजना करावी, अशी विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.