IPL 2022: आयपीएल स्पर्धेवर दहशतवादाचं सावट, वानखेडे स्टेडिअम आणि ट्रायडंट हॉटेलची रेकी
मुंबई । प्रतिनिधी
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आल्याचे समजते. त्यामुळे मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून आयपीएलचे (IPL 2022) सामने होणाऱ्या मैदानांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. यामध्ये वानखेडे मैदान दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे समजते. दहशतवाद्यांकडून वानखेडे मैदानाची रेकी करण्यात आल्याचे समजते. तसेच आयपीएल खेळाडुंचा मुक्काम असलेल्या ट्रायडंट हॉटेलच्या परिसराचीही दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे समजते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. (Terror attack threat over IPL 2022 matches)
आयपीएलचा १५वा हंगाम या वर्षी २६ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील सर्व लढती मुंबई आणि पुण्यात होणार आहे. यासाठी मुंबईतील ३ आणि पुण्यातील एका स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. साखळी फेरीत ७० सामने होणार असून त्यापैकी २० लढीत वानखेडे मैदानावर होतील. ब्रेबॉन स्टेडियवर १५, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर अनुक्रमे २० आणि १५ सामने होणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि राज्य राखीव दलाचे जवान आयपीएलच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. ही स्पर्धा २६ मार्च ते मे अखेरपर्यंत चालणार आहे.
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यावर खुलेपणाने माहिती द्यायला तयार नाहीत. मात्र, मुंबई पोलिसांकडून एक अंतर्गत परिपत्रक जारी करण्यात आल्याचे समजते. यामध्ये दहशतवाद्यांनी वानखेडे मैदान, ट्रायडंट हॉटेल आणि त्यामधील रस्त्याची पाहणी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वानखेडे आणि ब्रेबॉर्न या दोन्ही मैदानांवरील सुरक्षाव्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा मुक्का असलेल्या हॉटेलचा परिसर आणि खेळाडू मैदानावर जात असताना त्या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था आणखी कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.