राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९,६७,३४९ वर
- पुण्यात ४,८८५, मुंबईत २,२२७ नवे रुग्ण
मुंबई – राज्यात कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेले आणखी ३२५ रुग्ण दगावले असून बुधवारी दिवसभरात तब्बल २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ९ लाख ६७ हजार ३४९ वर पोहोचली असून सध्या २ लाख ५२ हजार ७३४ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ८८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरातील नव्या रुग्णांचा आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. एकाच दिवसात पावणे पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ७८ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात काल ६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्याचबरोबर ३ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. रुग्ण आणि मृतांची ही संख्या मंगळवार रात्री ९ वाजल्यापासून बुधवार रात्री ९ वाजेपर्यंतची आहे.
मुंबईतील रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस वाढतच असून बुधवारी दिवसभरात मुंबईत २ हजार २२७ नवे रुग्ण आढळले, तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबळींचा आकडा आता ७ हजार ९८५ वर पोहोचला आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ७४४ इतकी झाली आहे. तसेच बुधवारी मुंबईत ८३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यासह आतापर्यंत १ लाख २६ हजार ७४५ म्हणजेच ७९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ हजार ६५९ इतकी आहे.