राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी भाजपची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला, खासदारांना व्हीप
नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार असल्याने भारतीय जनता पक्षाने सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे.
भाजपने राज्यसभेवरील आपल्या सर्व खासदारांना 14 सप्टेंबर रोजी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला. विरोधी पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार देण्याचा चंग बांधला असला, तरी निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरीवंश यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजप-एनडीएकडून पुन्हा जनता दल (युनायटेड) चे खासदार हरीवंश यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आजच (बुधवार 9 सप्टेंबर) आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
गेल्या निवडणुकीत हरीवंश यांनी काँग्रेस उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांचा 125-105 अशा फरकाने पराभव केला होता. राज्यसभेत एनडीए समर्थक पक्षांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे पुन्हा भाजपच बाजी मारण्याची शक्यता आहे.