…म्हणून मी काल रात्रभर विचार करीत होतो – महापौर राहूल जाधव
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या वतीने 40-60 च्या दायित्वाप्रमाणे पीएमपीएमलअंतर्गत इलेक्ट्रीक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगित तत्वावर सुरू करण्यात येणा-या बसचे ट्रायल देण्यापूर्वी प्रसार माध्यमांचा धसका घेऊन महापौर राहूल जाधव यांनी सीट बेल्ट घालून, वाहतुकीच्या नियमांचे पालन करत ई-बस चालविली. उगाच आपल्या हातून नियमांचे उल्लंघन झाले तर माध्यमांना उत्तर देताना पंचाईत नको, म्हणून काल रात्रभर यावर विचार केल्याचे महापौरांनी मोठ्या मनाने सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या ६०-४० च्या दायित्वाप्रमाणात पीएमपीएमएलला ईलेक्ट्रिक बसेस देण्यात येणार आहेत. यातील ९ मीटर मिडी एसी बसचे परिक्षण आज गुरूवारी (दि.२९) महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. यामध्ये बसची चाचणी मार्गावर घेण्यात आली. या बसची बॅटरी क्षमता, पुर्ण चार्ज केलेनंतर मिळणारे किमी, प्रवासी आसनक्षमता, कंफर्ट, एसी इफेक्ट, सस्पेंशन, ऑटो ट्रान्समिशन, मोबाईल चार्जिंग इत्यादी माहिती महापौर व आयुक्तांनी तपासून पाहिली.
बसेस पहिल्या टप्प्यात ९ मीटर-२५ नग व १२ मीटर-१२५ नग भाड्याने घेण्याचे नियोजन आहे. या बसेस पुणे येथे भेकराईनगर डेपो व पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी डेपो येथे बसेसच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या बसेसच्या चार्जिंगसाठी अंदाजे तीन तास लागतात. एका चार्जिंगमध्ये १८३ कि.मी. (रुटवर सर्व स्टॉप घेत असून) १/२ तास चार्जिंगमध्ये ५० ते ६० कि.मी अंतर प्राप्त होतात. असे २२५ प्रतिदिनी कि.मी. होणार असून विनाथांबा २५० कि.मी..इतकी बसची एसीसह रेंज आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
पालिका चालविण्याचे सोडून महापौर रिक्षा-बस चालवू लागलेत
बसचे ट्रायल घेताना महापौर जाधव यांना खूपच विचार करावा लागला. बस चालविताना नियमांचे पालन करण्यापासून ते माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापर्यंत त्यांनी काल रात्रीपासून विचार केला आहे. एरव्ही कधीही जवळ नसलेले चारचाकी वाहन चालविण्याचे लायसन देखील आज स्वतःजवळ ठेवले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, महापौरांना कधी नव्हे ते आता माध्यमांची भिती का वाटू लागली आहे, असा प्रश्न त्यांना पडत असल्याचे जाणवू लागले आहे. तथापि, यावेळी शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी महापालिका वा-यावर सोडून महापौर रिक्षा आणि बसेस चालवित असल्याचा टोमणा हाणल्याने ही चर्चा अधिकच रंगत झाली.