महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली | महाईन्यूज
महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावलेली आहे. या याचिकेत महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळत महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून मोठी आहे, असं स्पष्ट केलेलं आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारला विचारणा करण्याचा सल्ला दिला आहे. महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची गरज नसून ते देशाचे राष्ट्रपिता आहेत.
महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून खूप मोठी आहे. जनता त्यांना सन्मानाच्या नजरेनं पाहते. महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी यापूर्वीसुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधींना भारतरत्न देणं म्हणजे त्यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी अशा साऱ्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत.