मोदींचे जिंकण्याचे चान्सेस 50 टक्क्यांनी घटले
- विख्यात आर्थिक व राजकीय विश्लेषक रूचीर शर्मा यांचा निष्कर्ष
नवी दिल्ली – सन 2017 मोदी पुन्हा निवडून येण्याची शक्यता 99 टक्के होती ती आता थेट 50 टक्के इतकी खाली आली आहे असे विश्लेषण प्रख्यात आर्थिक व राजकीय विश्लेषक रूचीर शर्मा यांनी केले आहे. मोदी विरोधक एकत्र येत आहेत त्यामुळे त्यांची फेर निवडीची शक्यता कमी होऊ लागली आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
सन 2014 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते पण त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी 31 टक्के इतकीच होती. तथापी विरोधक विखुरलेले असल्याने कमी मते मिळूनही मोदींच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. रूचीर शर्मा हे अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ असून ते लेखकही आहेत. ते सध्या डेमोक्रॅसी ऑन रोड नावाचे नवीन पुस्तक लिहीत आहेत.त्यात त्यांनी भारतातील 2019 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा आढावा घेतला आहे.
त्यांनी म्हटले आहे की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भारतातील राजकीय वातावरणात नाट्यपुर्ण वळण आले असून आता मोदींच्या जिंकण्याची शक्यता फिप्टी-फिप्टी अशी आहे. गेल्यावर्षी पर्यंत ही शक्यता 99 टक्के विरूद्ध 1 टक्का इतकी भक्कम होती. विरोधी पक्षांमध्ये होत असलेली एकी मोदींना आव्हानात्मक ठरणार आहे असे त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्यांनी 1990 पासून भारतातील निवडणुकांचा अभ्यास केला आहे. मोदींनंतर कोण हा प्रश्न भाजपचे समर्थक विचारत आहेत.
मोदींना सक्षम पर्याय नाहीं असे सांगितले जात आहे तथापी वाजपेयींच्या वेळीही असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. पण वाजपेयींचा पराभव झाला आणि ज्यांना ऍक्सीडेंटल प्राईम मिनीस्टर म्हटले जाते असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या रूपात देशाला मिळाले. भारतात उत्तरप्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. तेथे बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र आली तर ही आघाडी तेथे वर्चस्व गाजवेल त्यांची आघाडी झाली नाही तर तेथे पुन्हा भाजपलाच वर्चस्वाची संधी आहे इतके हे सोपे गणीत आहे असे म्हणाले.
उत्तरप्रदेशच्या मतदारांवर जातीय राजकारणाचाच प्रभाव आधिक आहे त्यात गेल्या 30 वर्षात कोणताही बदल झालेला नाही असेही त्यांनी नमूद केले. भारतातील निवडणुक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अलिकडेच भारतात एकूण 26 खेपा मारल्या आहेत. या भेटीतील अभ्यासातून त्यांनी मोदींना जिंकण्याचे चान्सेस आता कमी होत चालले असल्याचा निष्कर्ष काढला आहे.