मुलाच्या अंगावर बापानेच ओतले उकळलेले पाणी
पुणे |महाईन्यूज|
मुलाच्या अंघोळीसाठी पाणी तापवत ठेवल्यावर वडिलांनी त्याचा जाब विचारून उकळते पाणी १६ वर्षीय मुलाच्या अंगावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यात या मुलाचा पाय भाजला आहे.
या प्रकरणी संतराम बिराजदार (वय ३८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाची आई संगीता बिराजदार (३३) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेत नतेश (१६) जखमी झाला आहे. तक्रारदार बाणेर परिसरात राहतात. त्यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. संतराम यांच्याकडे कामासाठी आलेल्या मशिनवर तक्रारदार यांनी मुलाला अंघोळ करण्यासाठी पाणी तापवण्यास ठेवले होते.
यावेळी संतरामने पाणी तेथे ठेवण्याबाबत विचारणा केली. या वेळी तक्रारदाराने मुलाला अंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगितले. संतरामने त्यावरून शिवीगाळ करून गरम झालेले पाणी नतेशच्या अंगावर टाकले. यात मुलाच्या डाव्या पायाची मांडी भाजली आहे. या प्रकरणी आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिस अधिक तपास करीत आहेत.