‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची तर सुपूत्राला बार आणि पबची चिंता’, आशिष शेलारांचा सणसणीत टोला
मुंबई – “राज्य सरकार सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना कोणाचेही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आहे, तर पुत्राला पब आणि बारची चिंता आहे. बॉलिवूड मुंबईतून बाहेर जावं असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. रेस्तराँ आणि बारची वेळ वाढवयाची मागणी कोणीही केली नव्हती तरी त्यांची वेळ वाढवण्यात आली, सरकार या दोनच गोष्टींची काळजी करत आहे,” असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, “पब बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर नियम घालून का नाही मंदिरं उघडली गेली नाही. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. भाजपशी आधी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचं की नाही ते ठरवू. जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही,” असंही शेलार यावेळी म्हणाले.
… त्या वक्तव्याचा राजकीय संबंध नाही
“मी काल मुंबईत केलेल्या वक्तव्याचा राजकीय कोणताही संबंध नाही. ज्ञानेश महारावांनी केलेल्या वक्तव्यावरती ती टिप्पणी होती. मी मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचा कार्यकर्ता नाही. आमचं ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील आणि फक्त मराठा समाजातीलच स्त्री नव्हे तर सर्व समाजातील स्त्रीला हे सर्वोच्च स्थान मिळायला हवं ही माझी भूमिका आहे,” असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.