मुख्यमंत्री साहेब इगो सोडा – देवेंद्र फडणवीस
आरेमध्ये काम सुरू करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री साहेब इगो सोडा, आरेमध्ये काम सुरू करा, आम्ही टीका करणार नाही, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. या निर्णयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, आपला इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, मेट्रो वेळेत धावू लागेल. राज्य सरकारला अक्षरशः चपराक दिली आहे. मुख्यमंत्री यांना चुकीचे ब्रिफिंग केलेलं आहे. मुख्यमंत्री यांच्या निर्णयानेच मेट्रो मध्ये मिठाचा खडा पडला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, कंजूरमार्ग कार शेड जरी गेलं तरी आरेमध्ये काम करावंच लागणार आहे. कोणाच्या भरवशावर हे चाललं आहे? जनतेचे हे पैसे आहेत. राज्य सरकारने आरेमध्ये काम सुरू करावे, आम्ही कोणतीही टीका करणार नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. कांजूरमार्ग मेट्रोशेडबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाची बातमी ऐकली. त्यांना (विरोधकांना) जे करायचं ते त्यांनी केलं. आता कायद्याच्या माध्यमातून काय सकारात्मक भूमिका घेता येईल याबाबत सरकार भूमिका घेईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सर्व अधिकारी तसेच संबंधितांशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांसह एकत्र बसून पुढील भूमिका ठरवली जाईल. काम सुरु करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. कामं सुरु करण्यासाठी कुणी आडकाठी करु नये. विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय केंद्र सरकारच्या फारच जिव्हारी लागलाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. आम्ही घेतलेला निर्णय काही लोकांच्या जिव्हारी लागला. म्हणून केंद्र सरकारने असा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे.