‘कोरेगाव भीमा’ प्रकरणाची चौकशी सुरू – अनिल देशमुख
मुंबई |महाईन्यूज|
कोरेगाव भीमा दंगली प्रकरणात नेमके काय झाले होते आणि नक्की दोष कुणाचा, या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने चौकशी सुरू केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
कोरेगाव भीमासंबंधी सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी गुरुवारी काही प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मागील दहा वर्षांतील राज्यातील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरेगाव भीमा येथे दोन वर्षांपूर्वी दंगल झाली होती. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एल्गार परिषद झाली होती.
दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झाला असताना काही समाजकंटकांनी समुदायावर हल्ला केला होता. यामुळे त्या परिसरात दंगल झाली होती. कालांतराने या प्रकरणाचा तपास कदताना मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एल्गार परिषदेत दंगलीची बीजे रोवली गेली असल्याचा तपास पोलिसांनी केला आणि अनेक विचारवंतांना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरण सुरुवातीपासूनच वादात अडकले आहे.