मुंबईतील हॉटेल आता रात्री साडेअकरापर्यंत!
मुंबईमधील हॉटेल, रेस्तराँ, फूड कोर्ट आणि मद्यालये सकाळी ७ ते रात्री ११.३० या वेळेत, तर अन्य व्यापारी आस्थापना सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईत मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर मुंबईसह राज्यभरात टाळेबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे सर्व कारभार ठप्प झाले. कालांतराने हळूहळू टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारने दिलेल्या आदेशांच्या आधारे पालिकेने मुंबईमधील भाजी बाजार, बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. त्याचबरोबर हॉटेल, रेस्तराँ, फूड कोर्ट, मद्यालये एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार मुंबईमधील या आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. या आस्थापनांच्या वेळेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. ही बाब लक्षात घेत आता मुंबईतील हॉटेल, रेस्तराँ, फूड कोर्ट, मद्यालये सकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत खुली ठेवण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तसेच अन्य व्यापारी आस्थापना सकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले.
करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रांमधील निर्बंध कायम आहेत. व्यापारी आस्थापनांना सामाजिक अंतर, मुखपट्टीचा आणि सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन बंधनकारक आहे. राज्य सरकार आणि पालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५’मधील कलम ५१ ते ६० आणि ‘भारतीय दंड संहिता, १८६०’मधील कलम १८८ आणि लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा इक्बाल सिंह चहल यांनी या आदेशात दिला आहे.