”मी धमक्यांना घाबरत नाही”, ”काय चौकशी करायची ते करू देत” – दवेंद्र फडणवीस
सोलापूर । महाईन्यूज
”आम्ही सत्तेत असताना कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. आम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही. जनतेला आमचा कारभार माहित आहे. कोणाला काही आरोप करायचे असतील ते करू देत. कोणाला काय चौकशी करायची आहे ती करू देत”, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधा-यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिले.
भाजपकडे बहुमत असताना राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून घोटाळे बाहेर काढण्याची भीती भाजपच्या पदाधिका-यांना, माजी मंत्र्यांना दाखविली जात आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरण सोहळ्याला आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, रंजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू असे वक्तव्य केले आहे. त्याला फडणवीस यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ”आम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही, जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काही आरोप करायचे असतील तर खुशाल करावेत. आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही. कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत. कसलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणाला काय चौकशी करायचे ते करा”, असा इशारा फडणवीस यांनी दिला.