मिश्र रिले प्रकारात भारतीय चमूला ऑलिम्पिकचं तिकीट
महाईन्यूज | प्रतीनिधी
दोहा येथे सुरु असलेल्या World Athletics Championship स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिलं यश मिळवलं आहे. ४*४०० मिश्र रिले प्रकारात भारताच्या मोहम्मद अनस, व्ही.के.विस्मया, निर्मल नोह टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या चमूने टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. भारतीय खेळाडूंनी आपल्या हिटमध्ये तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ३:१६:१४ अशी वेळ नोंदवत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आला. यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ आहे.
रविवारी रात्री या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. मोहम्मदने शर्यतीची सुरुवात करत चांगला खेळ केला, मात्र दुसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडू विस्मया मागे पडली. मात्र वेळेतच स्वतःला सावरत विस्मयाने सर्व प्रतिस्पर्ध्यांनी मागे टाकत पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिच्या या पुनरागमनाला मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांनीच दाद दिली. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंमध्ये थोडा गोंधळ पहायला मिळाला, मात्र निर्मल टॉमने तिसरं स्थान पटकावून भारताचं ऑलिम्पिक तिकीट निश्चीत केलं.