मावळात ‘निसर्ग’ कोपला..पण, संवेदनशील आमदार धीर द्यायला धावला…!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/2-1.jpg)
आमदार सुनील शेळके यांची नुकसानग्रस्त भागात पाहणी
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचा सूचना
तळेगाव दाभाडे । महाईन्यूज । प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी, कष्टकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी गुरूवारी सकाळीच गाव, वाड्या-वस्त्यांवर धाव घेतली. शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेले नुकसान आणि घरांची पडझड याची पाहणी करुन प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत.
बुधवारी सकाळीपासूनच मावळ तालुक्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि पाउस सुरू होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळाच्या तडाख्यातून मुंबई बचावली आहे. पण, मावळ आणि मुळशी तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. मावळातील वादळी पावसामुळे अनेक गावांमधील घरांच्या तसेच शेड वरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोना विषाणु आणि लॉकडाउनच्या काळात हतबल झालेल्या नागरिकांना आता वादळी पावसाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हतबल झालेल्या नागरिकांना आणि नुकसानग्रस्तांना धीर देण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच आमदार शेळके यांनी नुकसान झालेल्या गावांना भेट देण्यास सुरूवात केली. तसेच, नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी चालु आहे.
यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सुदाम कदम, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले व इतर पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रातांधिकारी यांनी सर्व ग्रामसेवक, तलाठी यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. प्रमुख रस्त्यांवर पडलेली झाडे बाजुला करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
जखमी झालेल्या कुटुंबियांची विचारपूस…
सांगवडे येथील ज्ञानेश्वर राक्षे यांच्या घराचे पत्रे उडाले. व त्यात दोन लहान मुले व महिला जखमी झाले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपुस करुन आधार देण्याची भूमिका आमदार शेळके यांनी घेतली. पाऊस आणि जोरदार वाऱ्याने बहुतांश ठिकाणी शेती, घरे, पॉलीहाऊस, पोल्ट्री, शाळांचेही नुकसान झाले आहे. अनेकांना किरकोळ इजा, दुखापत झालेली आहे.
नुकसानग्रस्तांना धीर देण्याची गरज : आमदार शेळके
कोरोनाच्या संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या मावळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना ‘निसर्ग चक्रीवादळामुळे’ फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना धीर देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ७ वाजतापासून पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागात पाहणी करणार आहोत, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Untitled-1024x437.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Untitled-1-1024x581.jpg)