माझ्या योजना बंद केल्या तर याद राखा, शिवराजसिंह यांचा काँग्रेस सरकारला इशारा
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सातत्याने चर्चेत येत आहेत. निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतरही ते सातत्याने जनतेशी संपर्क साधत असून त्यांच्यामागे आपण ठामपणे उभे राहणार असल्याचा दिलासा देत आहेत. रविवारी त्यांनी राज्यातील बुधनी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले. कच्चा रस्ता असल्याने शिवराजसिंह हे दुचाकीवरुन सुरई गावात गेले. याचदरम्यान त्यांनी काँग्रेस सरकारला इशाराही दिला. माझ्या योजना सुरु ठेवा, नाहीतर याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.
ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटातील डायलॉग म्हटला. तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. टायगर अभी जिंदा है. मी पूर्वी पेनने काम करत असत. आता कामांसाठी लढेल. जे काम पूर्वीपासूनच मंजूर आहेत. ती पूर्ण केली जातील. माझ्या जेवढ्या काही योजना आहेत. त्याबाबत मी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोललो आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका अजून डळमळीत आहे, असेही ते म्हणाले.
नवीन मुख्यमंत्री आता म्हणतात की, थकबाकीदारांचे कर्ज माफ करु. तर कधी म्हणतात की, ३१ मार्चपर्यंतचे कर्ज माफ करु. पण मी त्यांना म्हणालो की, आम्ही तुमच्याकडून सर्व कर्ज माफ करुन घेणार आहोत.
शिवराजसिंह हे आपला मुलगा कार्तिकेय याच्याबरोबर बनियागाव आणि खजुरी येथे आले होते. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. खांद्यावर उचलून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.