महाविकास आघाडीचे ‘अमर, अकबर आणि अँथनी’ सरकार पायात पाय अडकून पडेल
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची पुण्यातील पत्रकार परिषदेत टीका
पुणे |महाईन्यूज|
महाराष्ट्रातील ‘अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार आहे. ते पायात पाय अडकून पडेल. मात्र, आम्ही सरकार पाडणार नाही, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी टिका करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दानवे म्हणाले की, गेल्या सहा वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना कुठलाच विषय मिळाला नाही. म्हणून ते कृषी विधेयकाला विरोध करत आहेत. विरोधक चुकीचे आरोप करीत आहेत. ते खोडून काढण्याचे आमचे काम आहे. आम्ही विरोधकांना घाबरत नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. गेली सहा वर्ष विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यातून ते कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर आरोप करीत आणि रस्त्यावर उतरत आहेत.
केंद्र सरकार बाजार समित्या बंद करणार नाही. मात्र बाजार समितीतील गोंधळ कमी करणार आहे. विधेयकामुळे व्यापारी हे थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एकीकडे ‘काटा’ दुसरीकडे नोटा असतील, असा दावा दानवे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल किमान आधारभूत किंमतीने विकला जाणार आहे. बाजार समित्या संपुष्टात येणार नाहीत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. स्पर्धा वाढल्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.