महाराष्ट्रात 15 जुलैला मुंबईसह ठाणे, पालघर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्रात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यभर चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या बुधवार, 15 जुलै रोजी मुंबईसह ठाणे, पालघर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 14 आणि 15 जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागांसाठी ऑरेंज आणि येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचं मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी व्हिडिओ ट्विट करत येत्या 24/48 तासांतील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत मागील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर गेल्या 3 तासांत मध्यम संथ स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांनी अनुभवला. दरम्यान पुढच्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी चांगल्या पावसा ची शक्यता असून मध्य महाराष्ट्र घाट भागात, कोकण, गोवा मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.