महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याचे आरोप म्हणजे केवळ “कोल्हे कुई”
- पक्षनेते एकनाथ पवार यांची टिका
- दत्ता साने यांच्या टिकेचा घेतला समाचार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सातत्याने कोणत्याही कामाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीची सत्ता जाऊन कोणीही प्रभावी पदाधिकारी आणि स्थानिक नेता नसल्याने साने यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून स्वत:चे अस्तित्व डळमळीत होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. साने यांचे हे आरोप म्हणजे केवळ “कोल्हे कुई” आहे, असा टोला सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी लगावला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांना शास्तीकर माफीचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना जाहीर केले आहे. त्याला प्रतुत्त्यर देताना एकनाथ पवार यांचे शास्ती कर माफीचे आश्वासन म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, अशी टिका साने यांनी केली होती. याबाबत एकनाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रक काढून साने यांच्या टिकेचे वाभाडे काढले आहेत. पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील नागरिकांना शास्तीकराचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि पालकमंत्री गिरिश बापट यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यातही राजकारण करून दत्ता साने यांनी शहरवासीयांच्या भावनेशी खेळ चालविला आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सलग पंधरा वर्षे सत्ता असतानाही त्यांना करदात्यांचे हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे करदात्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. हे सर्व टाळण्यासाठी भाजपाने सातत्याने प्रयत्न केला. निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन भाजपाने पाळले आहे. शहरातील करदात्यांची शास्तीकरातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करदात्यांना दिलासा मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा नाकर्तेपणा समोर आला आहे. पालिकेत सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांना करदात्यांना दिलासा देता आला नाही. पालिकेत भाजपाची सत्ता येऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. असे असतानाही भाजपाने सत्ताधारी म्हणून मतदारांना दिलेले आश्वासन पाळले आहे. मतदार भाजपाच्या कामगिरीवर समाधानी आहेत. हीच बाब साने यांना खटकत आहे. आपले पद आणि अस्तित्व डळमळीत होण्याची त्यांना सातत्याने भीती वाटत असते. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मात्र, शहरवासीयांना त्यांची ही ‘कोल्हे कुई’ची सवय चांगलीच माहित झाली आहे, असा टोला एकनाथ पवार यांनी लगावला आहे.