मराठा समाजाची फसवणूक ; लोकसभा निवडणूकीत भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचार
औरंगाबाद – भाजपा – शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलद्वारे दहा हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे जाहीर केले. त्यापूर्वीच अध्यादेश काढून मराठा समाजातील एसईबीसीतून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊ नये, असे कळविल्याने तातडीची बैठक घेण्यात आल्याचे सुरेश वाकडे यांनी सांगितले. सिडकोतील गुलाबविश्व मंगल कार्यालयात ही बैठक झाली.
सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यात येणार आहे. आंदोलनात दाखल झालेले गुन्हे, 42 हुतात्म्यांना आर्थिक मदत, वसतिगृहाचे बांधकाम या गोष्टी सरकार सहज करु शकत होते. त्याही केल्या नाहीत. अशी भुमिका डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडली. प्रा. चंद्रकांत भराट यांनी पाच मार्चला औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल. बैठकीचे स्थळ, वेळ लवकरच ठरवू. एकाचवेळी राज्यात आंदोलन व्हावे, यासाठी राज्यव्यापी बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी कोअर कमिटी बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणाचे पत्रक मागे घ्या
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आत नियुक्तीबाबतचे पत्र मागे घ्या. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला.