भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: दुसऱ्या दिवशीच्या खेळावर भारताचे वर्चस्व
सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव चार दिवसीय सराव सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय फलंदाजांनी कसून सराव केला. यात पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि हनुआ विहारीयांनी चमकदार कामगिरीची नोंद केली.
चार सामन्याची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलिया एलेव्हन विरोधातील सुरू असलेलेल्या सराव सामन्यात पाच खेलाडूंच्या चमकदार अर्धशतकी खेळींच्या बळावर भारताने 92 षटकांत सर्वबाद 358 धावांची मजल मारली. तर, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया एलेवन संघाने 4 षटकांत बिनबाद 24 धावांची मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलिया एलेवन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सलामीला उतरलेल्या पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलयांनी संयमी सुरूवात केली. मात्र, लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. डॅनिएल फॉलिन्सच्या गोलंदाजीवर तो केवळ 3 धावा करुन बाद झाला. यानंतर पृथ्वी शॉ आणि अनुभवी चेतेश्वर पूजाराने संघाचा दाव सावरायला सुरूवात केली. पूजाराहा संयमी खेळी करत असताना शॉने फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी संघ 96 धावांवर पोहोचला असताना शॉ मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. शॉने 69 चेंडूंचा सामना करताना 66 धावांची खेळी केली.
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विराट कोहली आणि पूजाराने सावध पवित्रा आजमावत संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यावेळी पूजाराने आपले अर्धशतक पुर्ण करत संघाला दिड शतकी वेस ओलांडून दिली. अर्धशतकानंतर 54 धावांवर असताना तो बाद झाला. तर आपल्या अर्धशतकानंतर कोहली देखिल परतला. कोहलीने 87 चेंडूत 64 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने संघाला 300 धावांपर्यंत मजल मारुन दिली. यावेळी दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, तर, 53 धावा करुन विहारी बाद झाला. तर, 56 धावांवर असताना रहाणे निवृत्त झाला. तर, रोहित शर्माने वेगवान खेळी करत 40 धावांची खेळी करत संघाला 350 धावांपर्यंत मजल मारुन दिली. यावेळी तळातील तीन्ही फलंदाज अश्विन, शमी आणि यादव एकही धाव न करता परतले.
प्रत्युत्तरात खेळण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलिया एलेवन संघाने वेगवान सुरूवात करताना दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा बिनबाद 24 धावांची मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव – 92 षटकांत सर्वबाद 358 (पृथ्वी शॉ 66, विराट कोहली 64, चेतेश्वर पूजारा 54, अजिंक्य रहाणे निवृत्त 56, हनुमा विहारी 53, ऍरोन हार्डी 4-50). ऑस्ट्रेलिया एलेवन पहिला डाव – 4 षटकांत बिनबाद 24 (डार्सी शॉर्ट नाबाद 10, मॅक्स बार्यन्ट नाबाद 14).
भारताने पहिला दिवस लावला सत्कारणी
चार दिवसाच्या सराव सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. यावेळी पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावत सामन्याचा पहिल्या दिवसा खेळ वाया घालवला. पहाटे साडे पाच वाजता हा सामना सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. त्यामुळे भारताच्या सरावावर पाणी फिरले होते. मात्र, तसे असले तरी विराटसेनेने तो वेळ सत्कारणी लावला. पावसामुळे मैदानात जाता न आल्याने खेळाडूंनी जिममध्ये धाव घेतली आणि व्यायाम करत वेळेचा सदुपयोग केला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील पराभवापासून बोध घेत भारताने सराव सामना खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. असा बोध यातून संघाने दाखवून दिला.