breaking-newsआंतरराष्टीय

भारत-पाकिस्तान यांच्यात कर्तारपूर मार्गिकेमुळे शांतता शक्य- सिद्धू

कर्तारपूर मार्गिकेमुळे अनेक शक्यता खुल्या झाल्या असून, या पुढाकारातून भारत व पाकिस्तान या दोन देशांतील शत्रुत्व संपण्यास मदत होईल, असे आशावादी प्रतिपादन पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांनी कर्तारपूर मार्गिकेच्या पायाभरणी समारंभासाठी पाकिस्तानात आल्यानंतर व्यक्त केले. भारतीय पत्रकारांसमवेत ते येथे आले असून, कर्तारपूर मार्गिकेच्या कार्यक्रमात नरोवाल येथे सहभागी होणार आहेत. व्हिसाशिवाय शीख भाविक यापुढे करतारपूर येथे जाऊ शकणार आहेत.

वाघा सीमेवर त्यांचे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. गुरुदासपूर जिल्हय़ातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका तयार करण्यात येणार असून, त्याचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार आहे. नवजोत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान इम्रान खान यांचे ही मार्गिका करण्यासाठी अनुमती दिल्याबाबत आभार मानले आहेत. या मार्गिकेमुळे दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्थापित होईल असे ते म्हणाले. इम्रान खान यांनी तीन महिन्यांपूर्वी जे बीज पेरले होते त्याचे आता रोप झाले आहे, शीख समुदायासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आता ते कर्तारपूरला जाऊन बाबा गुरू नानक यांचे आशीर्वाद घेऊ शकतील, यासाठी ७३ वर्षे जावी लागली. या मार्गिकेतून अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत, त्यातून शांतता प्रस्थापित होईल. सोमवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू व पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गुरुदासपूर येथे या मार्गिकेची कोनशिला बसवली होती.

कर्तारपूर कुठे आहे..

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात शाकारगड या नरोवाल जिल्हय़ात कर्तारपूर हे धार्मिक ठिकाण आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव हे या भागात १८ वर्षे वास्तव्यास होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button