भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती
नवी दिल्ली – लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांना अर्ध्या पगारावर समाधान मानावे लागले आहे. अशात सरकारी क्षेत्रातून एक आशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेकडून 1 लाख 40 हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च 2021 या काळात परीक्षा होतील. तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल 2021 ते जून 2021 असा असेल.
दरम्यान, आयसोलेटेड आणि मिनिस्टिअरल श्रेणीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून परीक्षेची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या चार दिवस आधी ई-कॉल लेटर उपलब्ध होईल. त्यापुढील प्रक्रियेची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. तसेच रेल्वे विभागाने 11 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी 2.44 लाख उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून या परीक्षेसाठी विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे. यावेळी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. शरीराचे तापमान तपासल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.