भारतीय क्रिकेटपटूंनी काळ्या फिती बांधून व्यक्त केला निषेध
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला टी २० सामना सुरू आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे ४० हून जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून व मैदानावर मौन पळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली. तसेच World Cup 2019 मध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असाही सूर दिसून आला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या भूमीत झालेली टी २० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे या मालिकेची विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने दोनही संघ मैदानात उतरले आहेत. या सामन्यात सलामीवीर शिखर धवन याच्या जागी लोकेश राहुल याचे पुनरागमन झाले आहे. तर मुंबई इंडियन्स संघातून खेळणाऱ्या मयंक मरकंडे याला टी २० पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.