भाजपानं ‘बेटी भगाओ’ कार्यक्रम सुरू केलाय का ?- उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई – लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विरोधकांनीही राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कदमांच्या आडून भाजपावर शरसंधान केलं आहे.
ते म्हणाले, राम कदमांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यापुढे कोणत्याही पक्षानं त्यांना उमेदवारी देऊ नये, राम कदम, छिंदम आणि परिचारक हे एकाच माळेचे मणी आहेत. राम कदम, छिंदम आणि परिचारक यांना माफी देणं म्हणजे वाल्मिकींचा अपमान करण्यासारखं आहे. बेटी बचाव, बेटी पढावचा नारा बदलून भाजपानं आता बेटी भगाओचा नारा दिलेला दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी राम कदमांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी कदमांवर धाडस दाखवून कारवाई करावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.