भरधाव टेंम्पोची बैलगाड्यांना धडक, एका उसतोड कामगाराचा मृत्यू
पुणे / महाईन्यूज
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी जवळ खाऱ्या ओढ्यावरील पुलावर भरधाव टेंम्पोने बैलगाड्यांना धडक दिली. यात एका उसतोडणी मजूराचा मृत्यू झाला. तर, तीन उस तोडणी कामगार जखमी झाले आहेत. या घटनेत दोन बैलांनाही जखमा झाल्या आहेत.
आज सोमवारी (दि. ३०) पहाटे पावणसहाच्या सुमारास भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उस तोडणी करण्यासाठी चार-पाच बैलगाड्या एकामागोमाग भवानीनगरहून बेलवाडी कडे निघाल्या होत्या. बेलवाडी व जाचकवस्तीच्या जवळ असलेल्या अरुंद पुलावरुन गाड्या पुढे जात असताना भवानीनगर बाजूकडून भरधाव वेगामध्ये आलेल्या टेंम्पोने बैलगाड्यांना धडक दिली. या अपघातामध्ये बैलगाडीमधील स्वप्निल उत्तम कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. संगिता सांगहे, अस्मिता जाधव, कोमल सांगळे हे जखमी झाले आहेत. स्वप्निल कांबळे व नागनाथ सांगळे यांचे बैल जखमी झाले आहेत.
याप्रकरणी टेंम्पोचा चालक नामदेव दशरथ कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार तपास करीत आहेत.