बिहार-उत्तरप्रदेशात विजा कोसळून दोन दिवसात 110 जणांचा मृत्यू
पाटणा | बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. बिहारमध्ये मागील अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी पावसात वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.
बिहारच्या गोपालगंज, पूर्वी चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी आणि नवादा या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने बिहारमध्ये पुढील 72 तासांचा अलर्ट जारी केला आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळाल्या, राज्य सरकारं बचावकार्यात तत्पर आहेत, मी मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.