बालाकोट हल्ल्याचे सत्य दडपण्याचा प्रयत्न?; पत्रकारांसह पाक सैन्याची घटनास्थळी भेट
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे सत्य दडपण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. कारण, कारवाईला एक महिना उलटल्यानंतर पाक सैन्याने आपल्या काही निवडक पत्रकारांना घेऊन घटनास्थळाला भेट दिली. पाकिस्तानी सरकारमधील काही सुत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा इंडिअन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात केला आहे.
इंडिअन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २८ मार्च रोजी पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आपल्या ८ माध्यम प्रतिनिधींना घेऊन बालोकोटला गेले आणि त्यांना घटनास्थळी काहीच झाले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी एमआय हेलिकॉप्टरमधून हे लोक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने माध्यमांना ती जागा दाखवली जिथे पाकिस्तानच्या फ्रन्टिअर कॉर्पसचे (पाकिस्तानी अर्धसैनिक दल) १०० कमांडो पहारा देत होते. हल्ला झालेल्या त्या ६ एकर जागेपैकी ४ एकरची जागा एका ताडपत्रीसारख्या कागदाने झाकून टाकण्यात आली होती. म्हणजेच पाकिस्तानी सैन्याने आपल्या माध्यमांना तेच दाखवले जे त्यांना दाखवायचे होते. झाकलेल्या जागेत नक्की काय होते हे माध्यमांना कळू शकले नाही.
यावेळी पाक सैन्याने माध्यम प्रतिनिधींना तिथे ३०० मुलांशी आणि काही मौलवींशी भेट घडवली, त्यांच्यासोबत चर्चेचे चित्रीकरणही करण्यात आले. असे सांगण्यात येत आहे की, आधीच सैन्याने तिथे ही व्यवस्था केली होती. त्यावरुन या ठिकाणी भारताच्या हवाई हल्ल्यामुळे काहीच झालेले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या या करवाईमुळे आमचे काहीच नुकसान झालेले नाही, असा दावा वारंवार पाकिस्तानने केला आहे. याच खोटेपणाला खरं दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून हा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे.