पीडित तरुणीवर गावात पार पडला अंत्यसंस्कार
नागपूर | नागपूर – वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. सात दिवसांपासून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज सकाळी 6.55 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले.
त्यानंतर आज तिच्या मुळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कुटुंबीयांना आणि ग्रामस्थाना शोक अनावर. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांचे समाधान झाले. तसेच त्यांनी मृतदेह स्वीकारला. यानंतर ते आपल्या गावाच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी फुलराणीच्या निधनाचे वृत्त समोर येताच कुटुंबियांनी नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात आक्रोष केला. एकही शासकीय अधिकारी येऊन भेटले नाहीत.
फुलराणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. वडिलांसह गावातील सरपंचांनी सुद्धा रुग्णालयात संताप व्यक्त केला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यस्थी केली. तसेच कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
फुलराणीच्या मृत्युनंतर दारोडा गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. फुलराणीचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या शववाहिकेला अडथळा निर्माण झाला होता. ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.