फडणवीसांनी शेतक-यांची माफी मागावी – विशाल वाकडकर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना कर्ज माफी दिल्याची पहिली यादी जाहिर होताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिध्दीचा स्टंट करीत ‘मेडिया स्पेस’ भरून काढण्यासाठी शेतक-याने रक्ताने लिहिलेले एक पत्र आणि इतर काही पत्रे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली. स्वत:ची नामुष्की झाकण्यासाठी बळीराजाचे रक्त शोषण करणा-या ‘ शोषित भाजपाचा’ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे. असे पत्र पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर आणि राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
मागील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाणे पुसली. मागील विधानसभा निवडणूका होण्यापूर्वी कर्जमाफी जाहिर करण्याचा दिखावा केला आणि शेतक-यांच्या मागे ऑनलाईन कागदपत्रे जमा करण्याचा ससेमीरा लावला. राज्यपालांना दिलेले एक पत्र मानवी रक्ताचेच असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिका-याने माध्यमांसमोर दिला. हे जर खरोखरच मानवी रक्त असेल तर ते एका गरजू रुग्णाला देण्याऐवजी अशा प्रसिध्दीसाठी वापरणे हा प्रकार लांछणास्पद आणि शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा आहे. सुरु झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अनेक लोकोपयोगी विधेयके पास होणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार रावसाहेब दानवे यांना आपण सत्तेबाहेर आहोत हे अजून पचनी पडले नाही. त्यामुळे ते रोजच महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशा वल्गना करीत आहेत.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीमंडळ हे शेतकरी, कामगार, व्यापारी, गृहिणी, विद्यार्थी, लघुउद्योजक अशा समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारे निर्णय घेत आहेत. त्यामुळेच फडणवीस, पाटील आणि दानवे या त्रिकुटांना सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांची स्वप्ने कदापी पुर्ण होणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध करण्याऐवजी अधिवेशनात मांडल्या जाणा-या विधेयकांवर समाज उपयोगी चर्चा घडवून आणावी. असे आवाहन विशाल वाकडकर यांनी केली आहे.