प्राधिकरण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदाशिव खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची निवड झाल्याने त्यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर, प्राधिकरण आणि महापालिका यांच्यातील वादग्रस्त प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अध्यक्ष खाडे यांच्या माध्यमातून आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही नगरसेवकांनी केल्या.
अध्यक्ष सदाशिव खाडे यांना शुभेच्छा देताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, एखादे पद मिळण्यासाठी पक्षात राहून किती दिवस वाट पाहावी लागते. हे खाडे यांच्यासारख्या पक्षनिष्ठेच्या कार्यकर्त्याकडून शिकावे. तब्बल 14 वर्षानंतर त्यांना प्राधिकरणावर संधी मिळाली. खाडे हे गटात असले तरी तटात न पडता जनतेची कामे करण्यावर भर देतात. अजात शत्रु असं त्यांचं व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाच्या हद्दीचा वाद सोडवून कामे करवून घ्यावीत.
नामदेव ढाके म्हणाले, गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून त्यांच्यासोबत भाजपचं काम करत आहे. त्यामुळे खाडे यांच्या व्यक्तीमत्वाचा मी आदर करतो. त्यांनी पक्षात आणि पक्षबाह्य विविध पदांवर काम केले आहे. ते भाजपचे अध्यक्ष असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. तसेच नगरसेवक केशव घोळवे यांची सुध्दा मोठ्या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांना कामगारांचे प्रश्न सोडविण्याची नामी संधी उपलब्ध आहे. या दोघांना मी मनापासून शुभेच्छा देतो. याशिवाय, बाबू नायर, राहूल कलाटे, मोरेश्वर शेडगे, मंगला कदम, योगीता नागरगोजे, झामा बारणे, सुजाता पालांडे, आशा शेंडगे, सीमा सावळे, अभिषेक बारणे, सचिन चिखले, दत्ता साने आदींनी खाडे आणि घोळवे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, काही मागण्या देखील खाडे यांना करण्यात आल्या.
सदाशिव खाडे म्हणाले, भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा मिळवून देण्याचा विषय लवकरच मार्गी लावला जाणार आहे. यापूर्वी प्राधिकरणाने 11 हजार 500 घरे बांधली. नुकतेच 6 हजार घरांची वर्क ऑर्डर दिली. प्रथम नागरकांच्या घरांचा प्रश्न सोडविला जाणार आहेत. शिवाय, सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांना भेडसावणारे प्राधिकरणाशी संबंधित सर्व प्रश्न घेऊन आलात तर तत्काळ प्रशासनाशी बैठक लावून ते प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले.
केशव घोळवे म्हणाले, नगरसेवकांनी केलेल्या कौतुकामुळे माझ्यात दहा हत्तींचं बळ आलं आहे. कामगारांना किमान वेतन देण्याचा कायदा 1988 रोजी लागू झाला. त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. 70 वर्ष झाली तरी राज्यात कुठेही हा कायदा आमलात आणला गेला नाही. हा कायदा आमलात आणण्याची सुरूवात प्रथम महापालिकेपासूनच करणार आहे. त्यासाठी आयुक्तांसोबत संघर्ष होण्याचे देखील संकेत त्यांनी दिले.