प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई, अजित पवार म्हणाले…
मुंबई – ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथकाने मंगळवारी धाड टाकली.
प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काहीही वक्तव्य केलं नव्हतं. अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत मत व्यक्त केलं.
इडी’च्या कारवाईत पोलिसांचा वापर केला जातो पण सीआपपीएफच्या जवानांना घेऊन कारवाई करण्यात आली. याबद्दल अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारित असलेल्या एजन्सींचा वापर कसा करावा या पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करत असतं. राज्यात काही समस्या उद्भवली तर राज्यातील सरकारचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. राज्यातील पोलिसांनी विविध सरकारांच्या काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे. या वेळी ‘ईडी’च्या कारवाईसाठी पोलिसांना सोबत का घेतलं नाही त्याची कल्पना नाही!”
“माझा अद्याप प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणं झालेलं नाही किंवा इतर कोणाशीही बोलणं झालेलं नाही. आम्ही कॅबिनेट बैठकीत असताना मला ही बातमी मिळाली. कॅबिनेट संपल्यावर मी लगेच कराडला निघालो. तिथून रात्री पुण्याला वास्तव्यास थांबलो आणि आता सकाळी तुमच्यासमोर आहे. त्यामुळे मला या संदर्भात माहिती घ्यायला जमलेलं नाही. पण मी इतकंच सांगतो की शरद पवार यांनी या प्रकरणावर अतिशय योग्य असं मत पक्षाच्या वतीने मांडलेलं आहे”, असेही अजित पवार म्हणाले.