प्रकाशझोतातील सामन्यांमुळे कसोटीला नवसंजीवनी -अश्विन
नवी दिल्ली : प्रकाशझोतातील सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटला एकप्रकारे नवसंजीवनी लाभेल, असे मत भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. ‘‘प्रकाशझोतातील सामन्यांमुळे पुन्हा एकदा चाहते कसोटी क्रिकेटकडे वळतील, अशी आशा आहे. रात्री ८-९ वाजेपर्यंत खेळ रंगणार असल्याने चाहते त्यांचे काम आटोपून कुटुंबीयांसोबत सामना पाहण्यासाठी स्टेडियम गाठू शकतात अथवा टीव्हीवर लढतीचा आनंद लुटू शकतात,’’ असे अश्विन म्हणाला.
बांगलादेशच्या खेळाडूंना सूर्यास्ताची चिंता – व्हेटोरी
कोलकाताच्या परिसरात सायंकाळी लवकर सूर्यास्त होतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते, म्हणूनच बांगलादेशच्या खेळाडूंना सध्या याचीच सर्वाधिक चिंता आहे, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक डॅनिएल व्हेटोरीने व्यक्त केली.
‘‘दिवसाच्या पहिल्या सत्रात गुलाबी चेंडूचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. परंतु कोलकातामध्ये साधारणत: ४-५ वाजताच्या सुमारास सूर्यास्त होत असल्याने दुसऱ्या सत्रात वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असेल. त्यामुळे या सत्रात भारताच्या गोलंदाजांना कशाप्रकारे खेळायचे, यावरच आम्ही तूर्तास रणनीती आखत आहोत,’’ असे व्हेटोरी म्हणाला.