पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं…
भारत आणि चीन सीमावादामुळे गेले काही दिवस तणावाचं वातावरण होतं मात्र याबाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे.
चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत. पेट्रोलिंग प्वाईंट 14 ही तिच जागा आहे जिथं 15-16 जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत. दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंटवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत सैन्य सध्याच्या ठिकाणावरुन मागे हटलं आहे. तणाव निवळण्यासाठी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्यात येणार आहे.
भारत आणि चीन यांच्यातील कमांडर स्तरावर 30 जून रोजी तब्बल दहा तास चर्चा झाली. पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्याच्या परिसरात यापुढे दोन्ही सैन्यांमध्ये हिंसक झटापटी होणार नाहीत, तसंच दोन्ही देशांच्या जवानांदरम्यान वारंवार शाब्दिक बाचाबाचीही होणार नाही, यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा ही चर्चा झाली.