पुणे ते दिल्ली प्रवासात निघालं झुरळ; ‘इंडिगो’ला ग्राहक मंचाचा दणका
पुणे |महाईन्यूज|
पुणे ते दिल्ली दरम्यान विमान प्रवास करताना प्रवासात आसनाखाली झुरळ निघल्यामुळे झालेल्या त्रासापोटी दोन प्रवाशांकडून ग्राहक मंचात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्रवाशांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड) कंपनीला दिला आहे. विमान प्रवाशांना तिकिटाची रक्कम नऊ टक्के व्याजदराने परत करण्यात यावी, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी नुकताच हा निकाल दिला. विमान प्रवासी स्कंद असीम बाजपेयी (रा. कल्पिका अपार्टमेंट, शीला विहार कॉलनी, कोथरूड) आणि सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराई हाइटस्, एमआयटी कॉलेज रस्ता, कोथरूड) यांनी इंडिगो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या विरुद्ध मंचाकडे तक्रार केली होती. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी ही तक्रार दाखल केली होती.