पाटणा अद्याप पाण्याखाली
बिहारमध्ये पावसाच्या बळींची संख्या २५
पाटणा : बिहारला गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने झोडपून काढले असून पाटणा शहरातील काही भाग अद्यापही पाण्याखाली आहेत, राज्यात पावसाने घेतलेल्या बळींची संख्या आता २५ वर पोहोचली आहे.
पाटणामध्ये पावसाने सकाळपासून विश्रांती घेतली असली तरी सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गया जिल्ह्य़ात सहा जण मरण पावले आहेत. यापैकी पाच जण भिंत कोसळल्याने जिवंत गाडले गेले, तर एक जण नदीच्या पुरामध्ये बुडाला आहे.
जेहानाबाद जिल्ह्य़ात एका तीन वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावर घराची भिंत कोसळून तिचा दुर्दैवी अंत झाला. रविवारी राज्यभरातून १८ जण मरण पावल्याचे वृत्त आले होते, तर अनधिकृत वृत्तानुसार पावसाने आतापर्यंत ३० बळी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
पाण्याखाली गेलेल्या भागात अडकून पडलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे पुरविण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवावे अशी विनंती राज्य सरकारने भारतीय हवाई दलास केली आहे. जिल्हा प्रशासनाने १ ऑक्टोबपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.