पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते मनिष तिवारी यांनी भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्यावर टिका केली आहे. धनोआ यांनी काल चंदीगड येथील एका कार्यक्रमात राफेल विमानांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन तिवारी यांनी धनोआ यांचे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. राफेल भारतीय दलामध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तानला नियंत्रण रेषेजवळ फिरकताही येणार नाही, असं मत धनोला यांनी व्यक्त केले होते. यावरुनच तिवारी यांनी धनोआ यांना लक्ष्य केले आहे.
तिवारी यांनी धनोआ यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये धनोआ यांचे वक्तव्य हे राजकीय हेतून प्रेरीत (पॉलिटीकली लोडेड) असल्याचे तिवारी म्हणाले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘सामान्यपणे वर्दीमधील लोकांबद्दल मी अशा सार्वजनिक माध्यमांवर मतप्रदर्शन करत नाही. मात्र मी हे विनम्रपणे सांगतो की एअर चीफ मार्शल धनोआ यांचे हे (राफेलसंदर्भातील) वक्तव्य निवडणुकांच्या काळात राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे वाटते. भारताच्या सध्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकणारे हे वक्तव्य आहे. हे वक्तव्य टाळता आले असते.’
तिवारी यांनी भाजपा आणि काँग्रेसमध्ये राफेल करारावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही टिका केली आहे. तर दुसरीकडे धनोआ यांनी केलेले राफेसंदर्भातील वक्तव्य हे भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केले होते. भारतीय हवाई दलाने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीमधील बालाकोट येथील दहशवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता.